महाराष्ट्राला फोकस्ड मुख्यमंत्र्याची गरज, सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर प्रहार
राज्यच्या राजकारणात राजकीय खळबळ सुरू असताना, भाजप आणि शिंदे सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवर जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवल्यानंतर त्यावरून राज्यात मोठे घमासान सुरु झाले. त्यावरच आता राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
राज्याला सीरियस मुख्यमंत्र्यांची गरज
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, "माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी सगळ्या मंडळांमध्ये जावं, सगळं साजरं करावं. म्हणून मी सातत्याने म्हणते की महाराष्ट्राला सीरियस, फोकस्ड मुख्यमंत्र्याची गरज आहे. वेळ पडली तर या सरकारने दोन मुख्यमंत्री नेमावे, एकाने जरुर यात्रेवर जावं आणि एकाने राज्य चालवावं, म्हणजे आता जे महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे ते होणार नाही. कारण हे महाराष्ट्राला परवडणारं नाही." "या प्रकल्पामुळे लाखो नोकऱ्या मिळणार होत्या, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. म्हणाल्या की, "फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्र, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा काम सुरु आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या विरोधात हा कट करत आहे," असा आरोप सुळे यांनी यावेळी केंद्रसरकारवर केला.
शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "छत्रपतींचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलं. पण छत्रपती कधी दिल्लीसमोर झुकले नाहीत. परंतु राज्यसरकार दिल्ली जे सांगेल तेच करते. ही दुर्दैवाची गोष्टी आहे. काहीतरी नवी कल्चर महाराष्ट्रात येतंय. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि आपल्या इकॉनॉमीसाठी हानिकारक आहे." असे विधान त्यांनी बोलताना केले.