त्यांच्यासाठी आम्ही रोजगार मेळावा आयोजित करू; उदय सामंतांचा विरोधकांना खोचक टोला
प्रशांत जगताप | सातारा : आम्ही सत्ता घेतल्यामुळे त्यांचा रोजगार गेला आहे, त्यांच्यासाठी आम्ही रोजगार मेळावा आयोजित करू, असा टोला उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. साताऱ्यात युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावत युवकांना मार्गदर्शन केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
वेदांता प्रकल्पाबाबत पत्रकार परिषदा घेणं म्हणजे राज्याला बदनाम करण्याचा प्रकार आहे. हा प्रकल्प कोणामुळे गेला कश्यामुळे गेला? हे सर्वांना कळले आहे. त्याची श्वेतपत्रिका थोड्या दिवसात जाहीर होईल. सर्वांनी एकत्र येऊन काम केलं तरच महाराष्ट्र विकासात पुढे जाऊ शकतो. तिच भूमिका एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची आहे. आम्ही टीका टिपण्णीकडे दुर्लक्ष करत आहोत, असे उदय सामंत यांनी म्हंटले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार योग्य वेळी आणि लवकरात लवकर होईल. नाशिक येथील कार्यक्रमात भाजप आमदार सीतामाई हिरे यांचा अवमान झालेला नाही. त्या पद्धतीचे वातावरण तयार केलं जात आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांनी त्यांची फोनवरून चौकशी केली आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र काम करत आहे. दुसऱ्याच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.
महाविकास आघाडीमध्ये सगळेच आलबेल नाही त्याची उत्तरे काही लोकांनी दिले पाहिजे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. कर्नाटकच्या शपथविधीमध्ये काही लोक नव्हती त्यामुळे ही कसली वज्रमूठ? असा सवाल यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठीवर उपस्थित केला.