अब्दुल सत्तार व राष्ट्रवादीच्या आमदारात 'खुर्ची' वरून शाब्दिक चकमक
गजानन वाणी | हिंगोली : कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. यादरम्यान बैठकीचे आयोजन करण्यात आले होती. यावेळी अब्दुल सत्तार व राष्ट्रवादीच्या आमदारात मानपमान नाट्य रंगलेले पाहायला मिळाले. याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकप्रतिनिधींसाठी स्टेजवर आसनव्यवस्था करण्यात आली होती. परंतु, जे लोकप्रतिनिधी वेळेत आले नाहीत. त्याच्यासाठी लावण्यात आलेली खुर्ची काढण्यात आली होती. दरम्यान, वसमत विधानसभचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आले असता त्यांना स्टेजवर बसायला खुर्ची नसल्याने ते खाली अधिकारी वर्गात बसले.
यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधीला स्टेजवर बसण्याची व्यवस्था नाही का ?असा जाब विचारला असता अब्दुल सत्तार यांनी त्यांना चांगलेच सुनावले. बैठक 10 वाजताची होती. पण, तुम्ही 10 वाजून 30 मिनिटांनी आले, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला झापले. आमदार नवघरे यांनी यावेळी सत्कार देखील नाकारला. जिल्हा नियोजन बैठकीत खुर्चीवरून कृषीमंत्री व आमदारात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळाले. या मानपान नाट्याची चांगलीच चर्चा रंगली होती.
दरम्यान, राज्यभरात शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. जुलै, ऑगस्ट अतिवृष्टी पिकांचे नुकसान झाले आहे. परत परतीच्या पावसात देखील पिकांचे नुकसान झाले. परंतु. राज्यातला एकही शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे, अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीत सांगितले आहे.