आता मुंबईच्या तृतीयपंथीयांनाही मिळणार घरं, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
मुंबईच्या तृतीयपंथीयांनाही आता घरं मिळणार आहे. असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नागपूर सुधार प्रन्यासने बांधलेली 252 घरं तृतीयपंथीयांना देण्यात येणार असून त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाला दिले आहेत. तसेच यापुढे मैला उपसण्यासाठी नागरी स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात रोबोटचा वापर करता येईल का यादृष्टीनेही चाचणी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या घरांसाठी वित्त विभागाने तातडीने 6 कोटी 30 लाख रुपये सामाजिक न्याय विभागाला द्याव्यात अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनाही सूचना दिल्या. त्यानंतर ही 252 घरे तृतीयपंथीयांना देण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
देशात प्रथमच तृतीयपंथीयांसाठी घरांचा प्रयोग नागपुरात राबविण्यात येणार असून त्याच धर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रातदेखील सिडको, म्हाडाच्या सहकार्याने तृतीयपंथीयांसाठी 500 घरे बांधण्यासाठी विशेष योजना तयार करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.
नागपूरमध्ये एनआयटीने 252 घरे बांधली असून या घरांची किंमत 9 लाख रुपये निश्चित केली आहे. या घरांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या अंदाजपत्रकातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या धोरणाप्रमाणे अडीच लाखांची सबसिडी प्रस्तावित करण्यात आली आहे.