भगवानगडाचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात; गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ग्रामपंचायतीचा मेळावा घेण्यास विरोध
विकास माने, बीड
भगवान गडावरचा दसरा मेळावा पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. 2015 साली पंकजा मुंडेंना भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला. आता त्यानंतर यावर्षी दसरा मेळावा कृती समितीने इथेच मेळावा घेण्याचं जाहीर केलं. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा चर्चेत आला. मात्र भगवानगडावर दसरा मेळावा घेऊ नये, असा ठराव भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांनी घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी, मालेवाडी आणि बीड जिल्ह्यातील घोगस पारगाव या गावांनी हा ठराव घेतला आहे.
गडाच्या पाच किलोमीटर अंतरावर कोणताही दसरा मेळावा घेऊ नये असं या पत्रकात म्हटल आहे. संत भगवान बाबांच्या गडावर कुठल्याही प्रकारचा सामाजिक/राजकीय दसरा मेळावा आणि भाषणास प्रतिबंध घालण्यात यावा. परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी केवळ संत भगवान बाबा समाधीचे दर्शन आणि सीमोल्लंघन यासाठीच भाविकांना परवानगी द्यावी, असा ठराव यावेळी घेण्यात आलाय. याबाबत पंकजा मुंडे यांनी कोणतीही भूमिका माध्यमांसमोर मांडलेली नाही. मात्र आता भगवान गडावरील दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.