तवांगमध्ये 8 दिवसांपूर्वीच घुसखोरी; पंतप्रधान देशापासून काय लपवतायत? - संजय राऊत
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी पिटाळून लावले. तवांगच्या यांगत्से येथे 9 डिसेंबरला उभय देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. पण भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर देत सडेतोड उत्तर देत चिनी सैनिकांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. या चकमकीत दोन्ही देशांचे काही सैनिक जखमी झाले. भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा सुनियोजित कट होता. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी चिनी सैनिकांची 15 दिवसांपासून तयारी सुरू होती. ठरलेल्या रणनीतीनुसार सोमवारी 17 हजार फूट उंचीवर यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी चीनचे 300 सैनिक पोहोचले होते.भारतीय सैनिक आक्रमक झाल्याचे लक्षात आल्यावर चिनी सैनिकांनी माघार घेतली. पण यादरम्यान चिनी सैनिकांनी दगडफेक केल्याचे सांगितले जाते. या संघर्षात दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले. सहा भारतीय जवानांना गुवाहाटीत उपचारासाठी नेण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी ते बोलत होते. राऊत म्हणाले की, 1961 च्या चीनी सैन्य तवांगच्या पुढे आलं होतं. स्थानिकांनी चिनी सैनिकांशी युद्ध करून तवांग देशात टिकवून ठेवलंय. मात्र आज केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे भारत चीन सीमेवर तणाव वाढला आहे. तवांगची घटना ९ डिसेंबर रोजी घडली असताना आता ती का उघड झाली? या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी द्यावं, आपलं आंतरराष्ट्रीय धोरण चुकत आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला.
तसेच पाकिस्तान, चीन हे देशाचे दुश्मन सीमांवरती धडका मारतायत. प्रधानमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलाय, हे तवांगवरून दिसून येतंय. आठ दिवसांपूर्वी ही घडना घडली, जखमी सैनिक गुवाहटीत उपचार घेत आहेत. हे का लपवलं गेलं? दोन्ही बाजूंचे सैनिक किती जखमी झाले? शहीदही झालेत का? याविषयी अधिकृत माहिती सरकार द्यायला तयार नाही. तवांगमध्ये आठ दिवसांपूर्वीच घुसखोरी झाली असताना गुजरात निवडणुकांसाठी हे सत्य लपवलं गेलं, पंतप्रधानांनी देशापासून एवढी मोठी घटना का दडवली.
यासोबतच लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढलं, चर्चा झाली, मग ते तवांगमध्ये घुसलं. देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारणातलं लक्ष कमी करून देशाच्या सीमांवर लक्ष द्यावं. चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसतोय, यावर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं राष्ट्राची सेवा होईल. आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न लावून धरणार आहोत. असे संजय राऊत यांनी सांगितले.