आदित्य ठाकरेंनी केलेला गौप्यस्फोट खरा - संजय राऊत
हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता राजकीय वातावरणात चर्चा रंगल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. एकनाथ शिंदे यांनी बंड का केले? यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलं आहे. भाजपसोबत गेलो नाहीतर मी तुरुंगात असेन, असे त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेले वक्तव्य सत्य आहे. अटकेची भीती असल्याचे शिंदेंनी मलाही सांगितले होते. शिंदेंना जेलमध्ये जाण्याची भीती होती. तेव्हा मी त्यांना समजावत होतो की, आपण प्रसंगाना सामोरे जाऊ. आपण लढणारे लोक आहोत. मी त्यांना म्हणालो होतो की, माझ्यावरसुद्धा असा प्रसंग येईल अशी भीती वाटते. पण मी अटकेच्या तयारीत आहे. असे राऊत म्हणाले.