शशिकांत वारिसेंच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? गृहमंत्र्यांना माहिती - संजय राऊत
कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं आहे.
याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचे साटंलोटं शशिकांत वारिसे बाहेर काढत होते. त्यामुळे शशिकांत वारिसे हे काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खुपत होते. राज्यात दिवसाढवळ्या खून पडत आहेत ही चिंताजनक स्थिती आहे. आंगणेवाडीतील भाजपाच्या सभेनंतर 24 तासात शशिकांत वारिसेंची हत्या हा योगायोग समजावा का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
यासोबतच वारिसेंच्या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? याची माहिती गृहमंत्र्यांना आहे. गृहमंत्री फडणवीसांनी हत्येमागच्या मास्टरमाईंडवर कारवाई करावी. शशिकांत वारिसेंच्या हत्या प्रकरणाची माहिती केंद्राकडे पाठवणार आहे. वारिसे प्रकरणात केंद्राने स्पेशल टीम पाठवून तपास करावा. माझा शशिकांत वारिसे करण्याची धमकी येत आहे. शशिकांत वारिसे यांचा विषय उचलू नका अशा धमक्या देण्यात येत आहेत. असे राऊत यांनी म्हटले आहे.