आसामला जाऊन पुन्हा नवस करणार का?संजय राऊतांचा एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी जत तालुक्यातील उमराडी गावात कन्नड वेदिका संघटनेच्या काही लोकांनी झेंडे फडकवल्याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
“२०१८ साली मी केलेल्या भाषणासंदर्भात माझ्याविरोधात गुन्हे दाखल केले जातात आणि आत्ता वॉरंट पाठवतात. यावरही सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. माझी लढाई व्यक्तिगत नव्हती, महाराष्ट्रासाठी होती. आता तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रावरचे हल्ले वाढले आहेत. याचा परिणाम फार वेगळा होईल. आम्हाला यात गांभीर्याने लक्ष घालावं लागेल”असे म्हटले आहे.
तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काय वाटतं हे त्यांना विचारायला हवं. ज्या दोन मंत्र्यांना सीमाभागासंदर्भातलं काम दिलंय ते चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे तीन तारखेला बेळगावला चालल्याचं मी वाचलं. कन्नड वेदिकेचे लोक महाराष्ट्रात येतात, हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय येऊ शकत नाहीत. ते आपले झेंडे लावतात हे महाराष्ट्र सरकारमधल्या काही लोकांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय होऊ शकत नाही. शिंदे सरकारवर हल्लाबोल करत राऊत म्हणाले की, “तुम्ही पुन्हा गुळमुळीत धोरण स्वीकारून हात चोळत बसणार आहात, दिल्लीकडे बघत बसणार आहात की त्या गावातून झेंडे लावायला घुसलेल्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा आसामला जाऊन नवस करणार आहात हे एकदा सांगा”असे राऊत म्हणाले.
यासोबतच अशा सरकारकडून या राज्याचं रक्षण होईल असं आम्हाला वाटत नाही. जसं काश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तींनी झेंडे फडकवावेत, त्या पद्धतीने हे लोक महाराष्ट्रात घुसलेत. त्या सगळ्यांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जावेत. असा इशारा राऊतांनी दिला आहे.