Maharashtra's 1st Glass Bridge : नापणे धबधब्यावरील आकर्षक काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला
नैसर्गिक सौंदर्याने नटलेला नापणे धबधबा सध्या पर्यटकांमध्ये नव्याने चर्चेत आला आहे. बारमाही प्रवाह असलेला हा धबधबा आता काचेच्या पुलामुळे अधिक आकर्षक ठरणार आहे. धबधब्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या अभिनव कल्पनेमुळे पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या भागातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने नापणे धबधब्याला प्राधान्य देत त्याच्या सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची योजना राबवण्यात आली. सिंधुदुर्गातील नापणे धबधब्यावर सिंधूरत्न योजनेतून राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. यामध्ये काचेचा पूल, पायऱ्या आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा समाविष्ट आहेत. या काचेच्या पुलाचे उद्धाटन नुकतेच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले असून हा पूल आता पर्यटकांसाठी खुला झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला असून, पश्चिम महाराष्ट्रातून या जिल्ह्यात प्रवेश करताना वैभववाडी हे पहिले प्रवेशद्वार ठरते. त्यामुळे नापणे धबधबा अनेक पर्यटकांच्या यादीत अग्रक्रमावर असतो. दरवर्षी देशी-विदेशी हजारो पर्यटक येथे भेट देत असतात.
पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा देण्याची गरजही अधोरेखित झाली आहे. सध्या येथे स्वच्छतागृह, चेंजिंग रूम यांसारख्या सुविधा नसल्यामुळे विशेषतः महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
कसे पोहोचाल?
नापणे धबधबा कोल्हापूर-तरळे राष्ट्रीय महामार्गावरील नाधवडे गावाजवळ असून, तेथून अंदाजे सहा किमी अंतरावर आहे. तसेच वैभववाडी रेल्वे स्थानकापासून केवळ तीन किमी अंतरावर हा धबधबा स्थित आहे.
हे निसर्गरम्य ठिकाण आपल्या सुलभतेसह आणि सौंदर्यासह पर्यटकांना नक्कीच भुरळ घालेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.