इम्रान खान यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने अटक ठरवली बेकायदेशीर
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटकच बेकायदेशीर ठरवली आहे. तत्पूर्वी त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेशही सरन्यायाधीशांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खानला शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
इम्रान खान यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. इम्रान खानची अटक वैध ठरवणारा इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याच्या याचिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. यावर सुनावणी करताना इम्रान खानच्या अटकेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोला (NAB)फटकारले. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एनएबीने न्यायालयाचा अवमान केल्याचे मान्य केले.
सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान खानला न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एनएबी पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयात हजर राहिल्यानंतर सरन्यायाधीशांनी इम्रान खानच्या सुटकेचे आदेश जारी केले. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे संकेत मिळाले.
काय आहे नेमके प्रकरण?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना एनएबी आणि पाक रेंजर्सनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेरून अटक केली. त्यानंतर पाकिस्तानात मोठा गदारोळ झाला होता. पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये इम्रान खान यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.