आदित्यला काय कळतं..., 'कोण ओळखतं त्याला? - नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काही दिवसांपुर्वी सत्ता गमावलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसकडून शिंदे-फडणवीस सरकारवर या गोष्टीचं खापर फोडलं जातंय तर, 'मागील वर्षभरात सरकारकडून कंपनीशी पुरेसा संवाद न झाल्यानं हे प्रोजेक्ट गुजरातला जात असल्याचं' वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. यातच आता नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले नारायण राणे
'आदित्यला काय कळतं. तो जी काय मागणी करत होता कंपनीकडे ती आता काहीच दिवसात बाहेर येईल. तुमचा काळ संपला. भविष्यात मंत्री मुख्यमंत्री यासारखी संधी तुम्हाला मिळणार नाही. . तुम्ही ट्विट करत राहा, पण ते कोणी वाचणार नाही', असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
पुढे म्हणाले, याबाबत जे काही ठरेल, ते आम्ही लवकरच सांगू. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही याबद्दल बोलत आहेत. पंतप्रधानांसोबत यासाठी अद्याप नवीन भेट ठरली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. उद्धव ठाकरेंना घर सोडत नाही. त्यांना आता काय काम आहे? घर बसल्या मीडियाला ब्रेकिंग न्यूज देत आहेत. स्वतः काही करू शकले नाहीत, त्यांच्या पापामुळे कंपनी महाराष्ट्रातून गेली, असा आरोपही राणे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी 'कोण ओळखतं त्याला'? असा सवाल केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे.