Nagpur Winter Session 
महाराष्ट्र

Nagpur Winter Session: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी; फडणवीसांचं स्पष्टीकरण, विरोधकांचे सवाल कायम

Devendra Fadnavis: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या केवळ ७ दिवसांच्या कालावधीवरून विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Published by : Dhanshree Shintre

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये आजपासून सुरुवात झाली. मात्र यंदाचं अधिवेशन केवळ ८ ते १४ डिसेंबर इतकंच ठेवण्यात आलं असल्याने सुरुवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विदर्भाच्या प्रश्नांवर केंद्रित असलेलं हे अधिवेशन केवळ एका आठवड्यात गुंडाळण्याच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेत, अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी सभागृहात मांडली.

भास्कर जाधवांची नाराजी

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच भास्कर जाधवांनी अधिवेशनाच्या मर्यादित कालावधीवर नाराजी व्यक्त केली.

"विदर्भ करारानुसार हिवाळी अधिवेशन हे विदर्भात आणि योग्य कालावधीत व्हायला हवं. आम्ही ८ ते १९ डिसेंबरपर्यंतचा कालावधी सुचवला होता. पण आता अधिवेशन फक्त सात दिवसांचं ठेवण्यात आलं आहे. निर्णय झाला, ते ठीक आहे; पण आमच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होईल असा संदेश देऊ नका," असे जाधवांनी सभागृहात स्पष्ट सांगितले.

नाना पटोलेंची कडवट टीका

काँग्रेसचे नाना पटोले यांनीही अधिवेशन वाढवण्याची मागणी करत सरकारवर निशाणा साधला.

ते म्हणाले, "महाराष्ट्र एकत्रिकरणानंतर किमान दोन महिने हिवाळी अधिवेशन नागपूरला भरावं, असे नियम होते. पूर्वी विरोधात असताना तुमच्याच मित्रांनी महिनाभर अधिवेशन चालवलं. आता सरकार एवढ्या घाईत का आहे? पुरवणी मागण्या सुद्धा घाईघाईने मांडत आहेत."

फडणवीसांचा प्रतिवाद

या दोन्ही मागण्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमावलीचा दाखला देत अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यामागील कारण स्पष्ट केले.

ते म्हणाले,

"अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या, विधेयकांची ओळख आणि अध्यादेश दाखवणे हे नियम आहेत. गेल्या ५० वर्षांच्या नोंदी पाहिल्या तर पहिल्या दिवशीचा अजेंडा यापेक्षा कधी वेगळा नव्हता. अधिवेशन जास्त काळ चालावं, ही आमचीही भावना आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक दिवस अधिवेशन मीच चालवलं आहे."

आचारसंहितेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, "सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. कधीही पुन्हा आचारसंहिता लागू शकते. म्हणूनच एक आठवडा आणि दोन दिवस एवढाच कालावधी ठरवला. उर्वरित दिवस पुढच्या वर्षी समायोजित करू."

फडणवीसांचा ‘रेकॉर्ड’ दाखवणारा टोला

नाना पटोले यांनी अध्यक्षांकडे पुन्हा अधिवेशन वाढवण्याची विनंती केल्यानंतर फडणवीसांनी आणखी एक प्रतिक्रीया दिली.

ते म्हणाले,

"रेकॉर्ड क्लिअर करतो, नाना पटोले अध्यक्ष असताना मुंबईतील अधिवेशने फक्त ३ आणि ५ दिवसांची झाली होती. बाकी राज्यांत १५-२० दिवस अधिवेशने सुरू होती. तिथे कोरोना नव्हता का? मग महाराष्ट्रातच अधिवेशनं एवढी कमी का चालली?"

विरोधकांचे प्रयत्न पुढेही सुरू

फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांनी विदर्भातील प्रश्नांची गंभीरता लक्षात घेऊन अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी कायम ठेवली. सभागृहात पुढील काही दिवस या विषयावर आणखी राजकीय तापमान वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

एकंदरीत, नागपूर हिवाळी अधिवेशनाची ‘कमी वेळ’ ही पहिल्याच दिवशी मोठी राजकीय चर्चा ठरली असून सरकार-विरोधकांमधील जुनी आकडेवारी, नियम आणि राजकीय स्मरणपत्रे पुन्हा एकदा अधिवेशनाच्या केंद्रस्थानी आली आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा