अदिती तेरेदेसाई
दरवर्षी २१ ऑक्टोबरला भारतात पोलीस स्मृती दिवस साजरा करतात. 21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैन्याने लडाखमध्ये भारतीय सैनिकांवर गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकले. या घटनेत दहा शूर पोलीस कर्मचारी शहीद झाले आणि सात जखमी झाले. आपल्या देशाचे रक्षण करत वीरगती प्राप्त झालेल्या त्या १० पोलिसांच्या स्मर्णार्थ हा दिवस साजरा केला जातो.
"सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय", हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य ऐकलं की उर अभिमानाने भरून येतं. सद्रक्षणाय म्हणजे चांगल्या लोकांचे रक्षण, खलनिग्रहणाय म्हणजे दुष्टांचा विनाश. वेळप्रसंगी स्वत:चे कुटुंब बाजूला सारून जनतेचं रक्षण करणारे असे हे वर्दी मधले देवदूत. वेळोवेळी त्यांनी त्यांच्या शौऱ्याचा गर्व वाटावा आणि त्यांच्या नि:स्वार्थीपणाने डोळ्याच्या कडा पाणावाव्या अशी कामगिरी केली आहे. मग ते 26/11च्या वेळी स्व:च्या अंगावर गोळ्या झेलुन कसाबला रोखणारे तुकाराम ओंबळे असो, निधड्या छातीने आतंकवाद्यांशी लढणारे हेमंत करकरे असो, 50 गरीब मुलांना दत्तक घेणाऱ्या रेहाना शेख असो किंवा हजारो लोकांना लॉकडाउनमध्ये अन्न पुरवणारे केरळचे पोलिस असो.
अशा असंख्य नि:स्वार्थ, धडसी, देशासाठी आणि जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या भारताच्या पोलिस बांधवांना लोकशाही न्युजचा सलाम.