(Raigad Rain Alert ) अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली अून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने महाड मध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. महाडच्या सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर रोहा शहराजवळून वाहणाऱ्या कुंडलिका नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज आहे तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.