गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींपासून काहीसे दूर असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून एक नवे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान राज्यात सुरु असणाऱ्या सततच्या पावासामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पुढे ढकलण्यात आलाय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच पत्र लिहून यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेचा बुधवारी होत असलेला मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली. राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी प्रत्यक्षात आणता येणे अवघड आहे. त्यामुळे आपण उद्या होणारा मेळावा पुढे ढकलत आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याठिकाणी मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.