गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आज दुपारी 2 वाजेपासून गंगापूर धरणातून 6160 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत धरणातून 3944 क्युसेक विसर्ग सुरू होता, त्यात आज वाढ करण्यात आली आहे. या विसर्गामुळे दुतोंड्या मारुती मंदिर परिसरात पाणी कमरेपर्यंत पोहोचले असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यंदाच्या हंगामात प्रथमच जून महिन्यात 315 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कायम असून, रामकुंड परिसरातही गोदावरी नदीचे पाणी भरभरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल त्र्यंबकेश्वरला 24 मिमी, आंबोलीत 32 मिमी आणि गंगापूरमध्ये 5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात 71 दलघफू पूरपाण्याची आवक झाली आहे.
हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला असून, नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.