पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. डीएचएफएल (DHFL) कर्ज घोटाळाप्रकरणी भोसले यांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मागील महिन्यात सीबीआयने त्यांच्या अनेक मालमत्तावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. अविनाश भोसले यांना अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयकडून मागील महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. डीएचएफएल व येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणी अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी झाली होती. बँक फसवणूक प्रकरणी संबंधित आज अखेर भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. यानंतर त्यांना पुण्यातून मुंबईत आणण्यात येत आहे. व अविनाश भोसले यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याआधीही फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अविनाश भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती. तसेच, पुण्यात एबीआयएलया विद्यापीठ रस्त्यावरच्या भोसले यांच्या कार्यालयात ईडीने छापा टाकला. याशिवाय फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली होती. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आता त्यांना डीएचएफएल प्रकरणी भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील तांबवे आहे. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरला गेले. त्यांचे वडील जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कामाला होते. पुढे अविनाश भोसले पुण्यात आले आणि रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात उतरले. यासोबत ते छोटछोटी बांधकाम कंत्राटं घेत होते. अविनाश भोसले यांनी 1979मध्ये ABILग्रुपची (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्टचर लिमिटेड) स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. भोसले यांना शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये (1995) कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामं मिळाली. याच माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी कालवे, धरणं बांधली. त्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं. या सरकारचं मुख्यालय पुणे असल्यानं ते अविनाश भोसले यांच्यासाठी अनेक अर्थांनी सोयीचं ठरलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात काम सुरू केलं, असं एका राजकीय पत्रकारानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.पुढे जलसंपदा विभागातील प्रकल्पांबाबत वाद निर्माण झाला, तेव्हा अविनाश भोसले यांनी जलसंपदा विभागातील कामं कमी करून इतर क्षेत्रांमध्ये उडी घेतली. गेल्या 15 ते 18 वर्षांत अविनाश भोसले यांची जी वाढ झालीय, ती प्रचंड वेगानं झालीय. जिला 'रॉकेट राईज' असं म्हटलं जाऊ शकतं, असं अविनाश भोसले यांचा प्रवास जवळून पाहिलेले जाणकार सांगतात. तर, महाराष्ट्रातील मंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.