मुंबईतील कुर्ला परिसरातील भूखंड अदानी समूहाला देण्यात येत असल्याच्या विरोधात काँग्रेसने आज, रविवारी जोरदार जनआक्रोश आंदोलन केले. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन कुर्ल्यात आयोजित करण्यात आले. गांधीवादी मार्गाने रस्त्यावर बसून निषेध नोंदवत त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.
लोकशाही मराठीशी बोलताना गायकवाड म्हणाल्या की, "आम्ही पूर्णपणे लोकशाही मार्गाचा अवलंब करून हे आंदोलन करत आहोत. याआधीसुद्धा दोन वेळा अशा प्रकारची आंदोलनं केली होती, पण त्यावेळी पोलिसांनी अडथळा आणला होता. एका आंदोलनात मला धक्काबुक्कीत इजा झाली होती. पोलीस खात्याला हे चांगलेच माहीत आहे."
त्या पुढे म्हणाल्या की, "आमचा प्रश्न आहे की अदानींसारख्या उद्योगपतीसाठी एवढा मोठा पोलीस बंदोबस्त का असतो? गरीब सामान्य माणसावर अन्याय झाल्यावर पोलिसांची मदत मिळेल का?"
कुर्ल्यातील मदर डेअरी भूखंड प्रकरण आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू होता. वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, "अदानीसारख्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ केली जातात, पण गरिबांचे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही. हे आंदोलन हीच मागणी घेऊन रस्त्यावर उतरलं आहे."
त्या म्हणाल्या की, "अदानीसारख्या काही उद्योगपतींना भस्म्या आजार झाला आहे. मुंबईसारख्या शहरातील महत्त्वाच्या जमिनी स्वतःच्या मालकीच्या असल्याप्रमाणे घे ऊन वापरणं, हे लोकशाहीत चालणार नाही. राज्य सरकारने ठरवावं, लोकशाही चालवणार का ठोकशाही?"
त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "पुरोगामी महाराष्ट्रात निदान लोकशाही तरी टिकली पाहिजे. एका उद्योगपतीसाठी हा निर्णय लागू करू नका. आधी कुर्लेकरांचे, जनतेचे म्हणणे ऐका." या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. यामुळे कुर्ला परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
हेही वाचा