Disha Salian Case Akhil Chitre tweet target Nitesh rane over Aditya Thackeray mimicry : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड घडली असून मुंबई पोलिसांनी यासंदर्भात नवा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात दिशा सालियन हिने आत्महत्या केली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे आणि कोणताही गैरप्रकार झाल्याचे संकेत नाहीत. या अहवालामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना एकप्रकारे क्लीन चिट मिळाल्याचे मानले जात आहे. भाजप नेते, मंत्री नितेश राणे, यांनी वारंवार त्यांच्यावर आरोप केले होते.
या अहवालावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला, तरी या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) निष्कर्षांनंतरही नितेश राणे दिशा सालियनच्या मृत्यूच्या संदर्भात शंका उपस्थित करत आहेत आणि आपले आरोप कायम ठेवले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत नितेश राणेंनी सार्वजनिक माफी मागावी आणि "नाक घासून" माफी मागावी, अशी मागणी केली. हे वाद आणखी चिघळत असताना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनीही सोशल मीडियावरून राणेंवर जहरी टिका केली.
सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, नितेश राणे यांनी सभागृहाबाहेर आदित्य ठाकरेंची मिमिक्री करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये राणे "ये चला... चला..." असे म्हणत त्यांची नक्कल करताना दिसतात. या प्रकारावर विरोधकांनी टीका करत राणेंवर राजकारणाची पातळी घसरवल्याचा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक उपरोधिक ट्विट केलं, "उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी, आणि आवाज कोंबडीसारखा... असा दिशाहीन जुहूचा निब्बर — ओळखा पाहू कोण?"
त्यानंतर SIT अहवालानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले की, "दिशा सालियन प्रकरणात SIT च्या अहवालानंतर जुहूचा निब्बर तोंडावर पडला आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो. आदित्य साहेबांवर चिखल फेकणाऱ्यांचे मुख असेच रंगत राहतील. तुम्ही कटकारस्थाने रचत राहा, पण आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत राहतील."
सालियन प्रकरण काही काळ विस्मृतीत गेल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं असून नव्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. SIT च्या निष्कर्षांनंतरही भाजप-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील संघर्ष शमण्याची चिन्हं नाहीत.
हेही वाचा...