दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात काल रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दोन वेळा हे धक्के जाणवल्याने अनेक जण आपल्या घरातून बाहेर आले. मध्यरात्री 1 वाजून 57 च्या सुमारास हे धक्के जाणवले असून या भूकंपाचं केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या मणिपूर इथं जमिनीपासून 10 किलोमीटर खोल असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर भारतात पाच तासांमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. या आधी मंगळवारी रात्री आठ वाजून 52 मिनिटांनी लखनौसहित उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल असल्याचं सांगितलं जात आहे.
नेपाळमध्ये तर 24 तासांमधला हा तिसरा मोठा भूकंपाचा धक्का आहे. हा भूकंप उत्तर प्रदेशातल्या लखनौ, मुरादाबाद, मेरठ, बरेली अशा शहरांमध्ये जाणवले. तर एनसीआर परिसरातल्या फरीदाबाद, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा या भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पण अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना झाल्याचं समोर आलेलं नाही.