कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यात नवा वाद उभा आहे. यावर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.अशातच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी इंदिरा गांधी यांनी सावरकरांसाठी लिहिलेल्या पत्राचे वाचन करत राहुल गांधींवर टीका केली आहे.
काय म्हणाले आशिष शेलार,
आशिष शेलार यांनी इंदिरा गांधींचं स्वातंत्र्यवीर सावकर यांना पाठवलेलं एक पत्र पत्रकार परिषदेत सादर केले.“या पत्रात इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर असा उल्लेख केला. राहुल गांधी वीर या शब्दावरुन आपल्या भाषणात ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या आजीचं पत्रसुद्धा त्यांनी वाचलेलं नाही”, असं आशिष शेलार राहुल गांधींवर टीका करताना म्हणाले.
“इंदिरा गांधी या सावरकरांचं युद्ध हे अतिशय धाडसी होतं असं म्हणतात. ब्रिटश सरकारच्या विरोधातील त्यांच्या कामांची नोंद इतिहासात होईल, असं कार्य सावरकरांनी केल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय”, असं शेलार म्हणाले.
“राहुल गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांचा अभ्यास केला नाही. आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं एवढ्यापुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय. म्हणून त्यांचं विधान हे बेअक्कलपणाचं आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो”, अशी टीका शेलारांनी केली.
आशिष शेलारांचां उद्धव ठाकरेंना टोला
“खरं म्हणजे हिंदुस्तानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धवजींनी तरी बोटचेपीची भूमिका घेऊ नये, अशी आशा होती. पण उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपीची भूमिका घेतली”, असा टोलाही आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“केवळ मी, माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी स्वत:च्या वडिलांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धवजी तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली? हा आमचा सवाल आहे”, अशी टीका आशिष शेलारांनी केली.