महागाई वाढतच चालली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. भाज्यांचे दर देखिल कडाडले आहे. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगा, तोंडली व मिरचीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे.
पावसामुळे शेतातील भाज्यांचं नुकसान झाल्याने दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र महागाईत आता पुन्हा झळ बसत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत भाजीपाला चढ्या दराने घ्यावा लागणार असल्याने गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.
नाशिक, पुणे, मुंबई आणि ठाण्यासह उपनगरातील बाजारांमध्ये भाज्यांचे दर तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. भाज्यांची आवक 25 ते 30 टक्क्यांनी घटली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात भाज्यांचं नुकसान झालं आहे.