पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू केले होते. रविवारी दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेलं रेस्क्यू ऑपरेशन रात्री 10 वाजेपर्यंत सुरु होतं. या दरम्यान 4 मृतदेह सापडले, तर 51 जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आलं. रात्री उशिरा रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आज सोमवार (16 जून) सकाळी 7 वाजता हे ऑपरेशन पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. परंतु, मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा येण्याची शक्यता आहे.
या पुलाचं बांधकाम 1990 मध्ये सुरू झालं होतं आणि 1993 पासून तो वापरात होता. गेल्या वर्षभरापासून तो पूल बंद अवस्थेत होता. नवीन पूल उभारण्यासाठी 8 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. दुर्घटनेतील जखमींना तळेगाव जनरल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री उशिरा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेऊन दिलासा दिला. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत, तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली.