आज विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस. आजही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यावर दणदणीत घोषणांनी आज कामकाजाला सुरूवात झाली. कुपोषणाचा विषयावरून आदित्य ठाकरे आज आक्रमक झालेले दिसले. राज्यात कुपोषणामुळे एकही बालक मृत्यूमुखी पडलेले नाही. इतर आजारांनी बालक मृत्यू पडल्याचं आदिवासी मंत्री विजयकुमार गावीत यांनी विधानसभेत सांगितलं. यावरुन विधानसभेत तुफान गोंधळ सुरू झाला. कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून विरोधकांनी सभा त्याग केली.
नेमकं काय घडलं
कुपोषणाच्या विषयावर कृषी मंत्र्यांच्या उत्तरावर बोलतांना अदित्य ठाकरे विधानसभेत बोलत असताना म्हणाले की, आदिवासी समाजासाठी आपण काही करू शकलो नाही, याची लाज वाटली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर एकच गोंधळ यावेळी सुरू झाला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत असंसदीय शब्द असल्याचे म्हटले. अडीच वर्ष आपण सत्तेत होता, आपल्या पिताश्रींना लाज वाटली असे म्हणायचे का, असे मुनगंटीवार उत्तर देतांना विरोधकांना म्हटले.
जयंत पाटलांनी केली अदित्य ठाकरेंची पाठराखण
मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ झाला. यावेळी आदित्य यांच्या मदतीसाठी जयंत पाटील धावून आले. मात्र, त्यांनी गैरसमज करु नये असे पाटील यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांनीदेखील आदिवासी समाजाची परिस्थिती बघताना राजकारणी म्हणून आपल्याला लाज वाटेल असं म्हणालो असल्याचे सांगितले.
विरोधकांचा सभा त्याग
आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेले उत्तर पटलावरून काढण्याची मागणी केली. त्यावर मंत्री विजयकुमार गावित यांनी वारंवार असंवेदनशील म्हणणे योग्य नसल्याचे सांगितले. ही जबाबदारी सर्व मंत्रिमंडळाची असून फक्त अदिवासी विभागांची नसल्याचे सांगितले. राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत. मग,आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर असते तर त्यांनी उत्तर दिले असते.मात्र,योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही. त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा, अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली. दरम्यान हा प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील आक्रमक झाले आणि आदिवासी विकास मंत्र्याचा निषेध करण्यासाठी सभात्याग करत असल्याचे जाहिर केले.