राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार काल घडला होता. सत्तारांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात काल दिवसभर गदारोळ सुरु होता. राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर अनेक राजकीय मंडळींनी प्रतिक्रिया दिली. त्यावरूनच आता भाजप नेते आणि राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या विधानावरून चिंता व्यक्त केलीय. “राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय बनला आहे”, असं मत त्यांनी मांडल आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झालाय. सगळ्या पक्षांनी एकत्र बसून याची एक आचारसंहिता तयार करायला हवी. कसं वागायला पाहिजे याची आचारसंहिता तयार व्हायला हवी. कुणीतरी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. अब्दुल सत्तारांचे वक्तव्य चर्चेचा विषय आहे. त्यांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर आलीय. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
जे काही घडलं ते घृणास्पद होतं- सुप्रिया सुळे
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानावर सुप्रिया सुळे यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "माझ्या संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने जे गलिच्छ विधान केले त्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटली यात काही आश्चर्य नाही. याप्रकारच्या भूमिकेचे समर्थन होत नसलं तरी याची जाण सगळ्यांनाच असते असे नाही." असं लिहीत त्यांनी सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तर, "मला असे वाटते की कुणी चुकीच्या मार्गाने जात असेल व त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत असेल तर त्याची नोंद करून आपण याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही. जे काही घडलं ते घृणास्पद होतं.मात्र त्यावर उमटलेली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा स्पष्ट करणारी होती." असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत व पुरोगामी बाजूचं कौतुक केलं.