शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. त्यावरून जामीनावर बाहेर असलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण राज्यसरकारने हटवले आहे. त्यावरूनच आता राज्यभरात राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावरच जामिनावर बाहेर असलेले संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निणार्यावर बोलताना राज्य सरकारचे त्यांनी कौतुक केले आहे. अफजल खान यांच्या कबरीजवळील अवैध अतिक्रमण हटवले तर ते चांगलेच झाले. असे एका शब्दात त्यांनी उत्तर दिले.
गुरुवारी ( १० नोव्हेंबर २०२२ ) सकाळी स्थानिक प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम पाडण्यास ( Afzal Khan Kabar ) सुरूवात करण्यात आली आहे. त्यावेळी अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अनधिकृत बांधकाम पाडताना माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिकांना कबर परिसरापासून ६ ते ७ किलोमीटर दूर हटवण्यात आले. अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कोर्टानं दिले होते . कोर्टाच्या आदेशाची आता प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे.