राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पवारांनी निर्णय मागे घेतला. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. यावरूनच सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यावरच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
सामनामध्ये शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवर दानवे म्हणाले की, संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. तसंच ते सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. पण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कालचा आग्रलेख हा संजय राऊत यांनी सामनामधून पत्रकार म्हणून लिहिलेला आहे. सामनात लिहिलं गेलं की, त्याची इतकी चर्चा होते, हे सामनाचं यश आहे. राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी संजय राऊत यांनी लिहिलं आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते आहेत. पण पक्ष चालवणं आणि मंत्रिपद चालवणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकवेळ मंत्रिपद चालवणं सोपं आहे. मात्र पक्ष चालवणं सोपं नाही. असे दानवे म्हणाले.
पुढे त्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, सत्ता संघर्षाच्या निकालासाठी मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही, असं म्हणता मग जर सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करायचा असेल तर त्यांनी तो करून दाखवावा. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मंत्रिपदं कोणाला द्यायची? पन्नास लोक गेले होते. पन्नास जणांना मंत्री व्हायचं होतं. शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार हा अंतर्गत स्पर्धेमुळे थांबलेला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.