मुंबई (संजय गडदे) : राज्यातील जनता वाढती महागाई, भ्रष्टाचार, सीबीआय, ई डी, या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर, प्रस्थापितांच्या फोडा फोडीचे राजकारण या सर्व बाबींना कंटाळली असून सक्षम राजकीय पर्याय म्हणून राज्यातील जनता आम पार्टीकडे बघत आहे. जनतेचे अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना प्रस्थापित पक्ष मात्र एकमेकावर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत, महाराष्ट्रात मराठा, ओबीसी, मागासवर्गीयांचे बढती मधील आरक्षना सारखा विषय मार्गी लावण्यात सरकार असफल ठरले आहे, अशातच आपचे दिल्ली व पंजाब मॉडेल जनतेचा चर्चेचा विषय बनला आहे. (Dhanraj Vanjari joins AAP along with OBC leader Haribhau Rathore)
दिल्ली सरकारचा शिक्षणाचा दर्जा, आरोग्य, मोफत वीज, महिलांची पेन्शन योजना, सुशिक्षित बेरोजगारांना दर महा भत्ता, या योजना बाबत सर्व देशभर चर्चा व कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्ष सर्व ताकतीने लढवणार आहे. प्रस्थापित पक्षाबद्दल लोकांमध्ये राग असून जनतेला सक्षम राजकीय पक्षाचा पर्याय देण्याकरिता येणाऱ्या काळात राज्यातील अनेक बहुजन तसेच ओबीसी नेते, कार्यकर्ते आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याची सुरुवात राष्ट्रीय ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह रिटायर्ड ए.सि.पी.धनराज वंजारी तसेच यवतमाळचे व्हाईट टायगर अमान भाई यांचा जाहीर प्रवेश केला.
दिल्ली येथे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते झाला, प्रसंगी महाराष्ट्र प्रभारी दिपक सिंगल, मुंबई प्रभारी अंकूश नारंग मुंबई प्रदेश अध्यक्षा प्रीती मेनन, महाराष्ट्र प्रदेश सचिव धनजय शिंदे, महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री विजय कुंभार पुणे ओबीसी मुस्लिम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर भाई अन्सारी ऑल इंडिया बंजारा संघाचे उत्तर भारताचे अध्यक्ष एस पी सिंग लबाना तसेच हरियाणा प्रदेशचे आम आदमी पार्टीचे नेते मखनसिंग लबाना या प्रसंगी उपस्थित होते. अनेक नेत्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला. आम् आदमी पार्टीचे ध्येय धोरण तळगळातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, २०२४ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वखाली या देशाला नवीन सक्षम पर्याय मिळणार असून नवीन क्रांती घडणार असल्याचा विश्वास माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी यावेळेस व्यक्त केला.