राजकारण

...तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते; संजय राऊतांचा राहुल गांधींना इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन भाजप, शिंदे गट आणि मनसे चांगलेच आक्रमक झाले असून ठिकठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलने करण्यात येत आहे. तर, या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे. वीर सावरकरांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्येही दरार पडू शकते, असे त्यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशांमध्ये तक्रारी दाखल करणे आणि त्यांच्या आधारावर प्रसिध्दी मिळविणे हा एक राजकीय उद्योग झाला आहे. आमची लोक अनेक नेते त्यांचे राजकीय बळी ठरलेले आहेत. तर, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलेले आहे. वीर सावरकारांविषयी कोणतीही बदनामी आणि त्यांच्याविषयी कोणतेही वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना सहन करणार नाही. हे सांगितल्यावर हा विषय संपतो, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्या यात्रेला देशभरात तसेच महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. या देशातील वातावरण हुकुमशाहीकडे व देशाला पुन्हा गुलामीच्या बेड्या ठोकणारे तसेच महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार अशा विषयांवर त्यांची भारत जोडो यात्रा आहे. ही यात्रा सुरु असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्येही दरार पडू शकते. आम्ही वीर सावरकरांना श्रध्दास्थान मानतो. आणि नेहमी मानत राहणार आहोत.

हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नाही तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे हे माझे स्पष्ट मत आहे. महाराष्ट्राला आणि देशाला वीर सावरकारांविषयी मोठा आदर आहे. इतिहास काळात काय घडले आणि नाही घडले हे चिवळत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. आणि राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला राऊतांनी राहुल गांधींना दिला आहे.

तर, वीर सावरकारांना भारतरत्न द्यावा अशी आमची मागील 10 वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, माझा नकली हिंदुत्ववाद्यांना प्रश्न आहे की, ते वीर सावरकरांना भारत रत्न देण्याची मागणी का उचलून धरत नाही. वीर सावरकर हे कधीच भाजप आणि आरएसएसचे श्रध्दास्थान नव्हते हे इतिहासही सांगतो. पण, आता राजकारणासाठी त्यांनी वीर सावरकारांचा विषय घेतलेला आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.

केंद्रात भाजपचे सरकार असतानाही भारतरत्न का देत नाही. त्यांचे सावरकर प्रेम नकली ढोंगी आहे का? याचा विचार करायला पाहिजे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. तसेच, हिंदुहदयसम्राट व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून वीर सावरकरांचा पुरस्कार केलेला आहे आणि तो कायम करत राहणार, असेही त्यांनी सांगितले.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण