राजकारण

चंद्रकांत पाटलांना ‘भीक’ आणि ‘लोकवर्गणी’ यातील फरक कळतो का? नाना पटोले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजपच्या नेत्यांची बौध्दिक दिवाळखोरी निघाली असून महापुरुषांबद्दल अपमान करणारी वक्तव्ये करताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर भाजपाच्या एकाही नेत्यांने अजून माफी मागितली नसताना भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्राकात पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करुन आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. चंद्रकांत पाटील यांना भीक, लोकवर्गणी व देणगी यातील फरक तर कळतो का ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरु करुन शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी या महापुरुषांनी आपल्याकडे जे होते ते सर्वस्व दिले. लोकांकडून वर्गणी, देणगीच्या स्वरुपात पैसे जमा केले व शाळा उघडल्या. लोकसहभातून शैक्षणिक संस्थांचा विस्तार गावखेड्यात केला. ह्या महान कार्यासाठी त्यांनी ‘भीक’ मागितली असे म्हणून चंद्रकात पाटील यांनी या महापुरुषांचा, त्यांनी केलेल्या महान कार्याचाच अपमान केला असे नाही तर बहुजन समाजाचाही अपमान केला आहे.

समाजाच्या विकासासाठी सरकारने निधी खर्च करणे त्यांचे कर्तव्यच आहे. शिक्षणावर खर्च करायचा नाही तर मग काय सरकारच्या जाहिरातबाजीवर करोडो रुपयांची उधळपट्टी करायची काय? सरकार जनतेच्या आरोग्य, शिक्षणासह कल्याणकारी योजनांवर पैसा खर्च करणार नाही तर मग कशावर करणार? सरकार जनतेसाठी पैसे खर्च करते म्हणजे काय उपकार करत नाही, जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरायचा असतो हे चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मंत्र्याला माहित नसावे, कारण त्यांचा पक्ष दोन-चार उद्योगपतींच्या दावणीला बांधलेला आहे आणि या उद्योगपतींच्या घरीच चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाचे सरकार पाणी भरते आणि जनतेच्या प्रश्नावर मात्र उलटे प्रश्न विचारते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशीच अवमानकारक वक्तव्ये केली, भाजपाचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपतींचा अपमान करणारे विधान केले. त्यांच्या या विधानाने संताप व्यक्त केला जात आहे. परंतु, भाजपाचे नेते एवढे निर्ढावले आहेत की साधी माफी मागण्याचे सौजन्यही या लोकांकडे नाही. हा सत्तेचा माज असून हा माज जास्त काळ टिकत नसतो. ज्या जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवले तीच जनता तुमचा माज उतरवेल हे चंद्रकांत पाटील व त्यांच्या पक्षाने लक्षात ठेवावे, असे नाना पटोलेंनी सुनावले आहे.

कोकणात 1 जूनपासून मासेमारीवर बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास मच्छीमारांवर कडक कारवाई

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे