राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु असताना शिंदे- फडणवीस सरकार कोणत्याही कधीही पडेल असे विधान विरोधकांकडून केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाला पाठिंबा देणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले आहे. येत्या पंधरा दिवसात महाविकास आघाडीचे १० ते १५ आमदार फुटतील, असे ते म्हणाले होते. याच विधानावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रत्युत्तर देत बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे.
काय दिले पटोलेंनी प्रत्युत्तर?
‘येत्या काही दिवसांत काँग्रेसचे १०-१५ आमदार फुटतील’ असे बच्चू कडू यांनी विधान केले होते. त्याबाबत नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कुणाच्याही वक्तव्यावर चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. राहुल गांधींची पदयात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली होती. त्यावेळी काही हौशे-नवशे लोकांनी राहुल गांधींची पदयात्रा आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी केली आहे.
काय म्हणाले होते बच्चू कडू?
२० ते २५ आमदार जरी इकडे तिकडे झाले, तरी सरकार मजबुतीने राहील आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटतील, हे सध्याच सांगणे शक्य नाही. पण १० ते १२ आमदार फुटणार, हे मात्र नक्की. येत्या १० ते १५ दिवसांत आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या अगोदर ही घडामोड होणार आहे. ठाकरे गटातील आमदार फुटण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. कारण तेथून जे निघायचे होते, ते आधीच निघालेले आहेत, असे ते म्हणाले होते.