राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीवरून सर्वच पक्षाचे रस्सीखेच चालू असताना, विरोधकांकडून शिंदे- फडणवीस सरकार पडणार असे दावे करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना मोठे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
काही वेळापूर्वी त्यांनी ट्विट केले की, सरकारचे काउंट डाऊन सुरू. शिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की.. असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी फेब्रुवारीत हे सरकार पडेल असा दावा केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यानंतर देखील अनेक महाविकास आघाडीतील नेत्यांनी वेगवेगळे भाकीत केले होते. त्यावरच आता राष्ट्रवादी काॅंग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी शिवजयंतीपर्यंत हे सरकार पडेल असे विधान ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी केले आहे.