महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आज मुंबई नुकताच मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. परंतु, बीकेसीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भाषणात विरोधकांवर निशाणा साधत शिंदे- फडणवीस सरकारचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, आज देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला देखील यातून फायदा होत आहे. ते म्हणाले, ''डबल इंजिन सरकारला सामान्य माणसालाही तीच आधुनिक सुविधा, तीच स्वच्छता आणि त्याच विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे, जो कधी फक्त साधन संपन्न लोकांना मिळत होता. यासाठी आज रेल्वे स्थानकांनाही विमानतळासारखं विकसित केलं जात आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील पुनर्विकास केला जात आहेत.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारत मोठी स्वप्न पाहतोय
स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदा भारत मोठी स्वप्न पाहत असून ती पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहे. याआधी गरिबीची चर्चा आणि जगाकडे मदत मागण्यात वेळ खर्च झाला. जगाला भारताच्या मोठ्या संकल्पावर विश्वास आहे हे प्रथमच घडत आहे. दावोसचा अनुभव शिंदे यांनी वर्णन केला. देशाबाबतइतकी सकारात्मकता का आहे? कारण भारत आपल्या सामर्थ्याचा चांगल्या प्रकारे सदुपयोग करत आहे. आज भारत जे करतोय ते समृद्धीसाठी आवश्यक आहे. आत्मविश्वासाने देश भरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने स्वराज्य व सुराज्यची भावना आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे.
काही काळासाठी वेग मंदावलेला, पण...
येत्या २५ वर्षांत राज्यातील अनेक शहरांत भारताच्या वाढीस गती देतील. मुंबईला भविष्यासाठी तयार करणे ही डबल इंजिन सरकारची जबाबदारी आहे. २०१४ पर्यंत १० ते ११ किमी मेट्रो धावत होती. जशी डबल इंजिन सरकार बनले तसे वेग वाढला. काही काळासाठी वेग मंदावला. पण, पुन्हा शिंदे फडणवीस सरकार येताच वेग पकडला आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर साधला आहे.
...असे छत्रपतींच्या महाराष्ट्रात होता कामा नये
मुंबईच्या विकासात स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीची गरज आहे. फक्त पैसे योग्यप्रकारे वापरता आला पाहिजे. विकासाचे काम रोखण्याचे काम केले तर भविष्य कसे उजाडेल. विकासासाठी मुंबईकर व्याकुळ राहता कामा नये. अशी परिस्थिती बदलत्या भारतात आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात होता कामा नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे.
महाविकास आघाडीच्या काळात प्रत्येक कामात खोडा घातला गेला
भाजपाची सरकार असो किंवा एनडीएची सरकार असो. विकासाआड आम्ही येणार नाही. मुंबईत याआधी असे होताना पाहिले नाही. मधल्या काळात डबल इंजिन सरकार नसल्याने प्रत्येक कामात खोडा घातला गेला, अशी टीका पंतप्रधानांनी महाविकास आघाडीवर केली आहे. असे पुन्हा होऊ नये म्हणून दिल्लीपासून मुंबईपर्यंत मदतीची गरज आहे, असेही आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
'शिंदे-फडणवीस सरकारची जोडी तुमचे स्वप्न साकार करतील'
मी तुमच्यासोबत उभा आहे. हे माझे वचन आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आलो आहे. छोट्या-छोट्या लोकांच्या पुरुषार्थाने नव्या उंचावर पोहचणार आहे. मी सर्व मुंबईकरांना विकास कार्यासाठी धन्यवाद देतो. शिंदे व फडणवीस सरकारची जोडी तुमचे सर्व स्वप्न साकार करतील हा माझा विश्वास आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी शेवटी म्हंटले आहे.