नवी दिल्ली : राष्ट्रवादी चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला असल्याचे शरद पवारांनी म्हंटले आहे. पक्षचिन्हाबाबत उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या गटाला थेट ठणकावलं आहे.
शरद पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी ईडीचं नावच माहित नव्हतं. पण आजकाल भांडण झालं तर ईडी लावेन म्हणतात. दिल्लीतील राज्यसभा खासदाराच्या घरावर छापा टाकला. आज सकाळी कोणीतरी सांगितलं की इतर राज्यातही हेच सुरु आहे. अनिल देशमुख यांना अटक करून 13 महिने ठेवलं. त्यात काही न आढळल्याने सुप्रीम कोर्टाने सोडून दिलं. संजय राऊत यांना अटक केली. त्यांनाही सुप्रीम कोर्टाने सोडलं. मोदींच्या विरोधात लिहितात म्हणून ही कारवाई केली. ईडी आणि सीबीआयचा राजकीय वापर केला जातोय, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
केरळात भाजप नाही. तामिळनाडूमध्ये नाही. गोव्यात नव्हती मात्र निवडून आलेलं आमदार तोडून सत्ता आणली. आंध्रप्रदेशात भाजप नाही. महाराष्ट्रात भाजप नव्हती. मध्यप्रदेशमध्ये नव्हती मात्र लोक तोडले मग सरकार आणले. राजस्थानमध्ये नाही. दिल्लीत नाही. पश्चिम बंगाल नाही, मग भाजप आहे कुठे? छोट्या छोट्या राज्यात भाजप आहे. देशात मूड बदलत आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे. देश बदलामध्ये सहभागी होतील, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.
लोक सोडून गेलेत त्यांना काय आधार आहे? पण चिंता करण्याची गरज नाही. यापूर्वी कॉंग्रेसचे चिन्ह बदलले होते. कॉंग्रेसचे दोन भाग झाले होते. कॉंग्रेस आय आणि कॉंग्रेस ओ. निवडणूक चिन्ह हा महत्त्वाचा आधार आहे. चिन्ह गेलं तरी लोक बदलत नाहीत. पहिली निवडणूक मी उमेदवार होतो. चिन्ह होतं बैलजोडी. त्यावर मी लढलो आणि निवडून आलो, असे शरद पवार यांनी सांगितले