नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिल्यामुळे राज्याच्या राजकारण चांगलेच तापले आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद आणखीच उफाळून बाहेर आला आहे. या वादादरम्यान आज ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. त्यावरच आता संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
काय दिले राऊतांनी उत्तर?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर बोचरी टीका केली. त्याला आता संजय राऊत यांनी लगेचच ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले की, हे जबाबदार गृहमंत्र्यांचे उत्तर नाही. सनसनाटी निर्माण करण्याचे शिक्षण तुमच्या प्रतिष्ठान मध्ये मिळत असेल.बाळासाहेब ठाकरे स्कूल मध्ये नाही. सेनेतून फुटून गेलेल्या आमदार व चिल्लर गद्दार महामंडळास इतका फौजफाटा कशासाठी? चोर आणि गुंडांची बाजू घेऊ नका. गृहमंत्री आहात याचे भान ठेवा. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
संजय राऊत यांच्या पत्रावर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नक्की हे पत्र सुरक्षा मागण्यासाठी आहे की केवळ सनसनाटी निर्माण करण्या करता आहे. हा माझा सवाल आहे. सुरक्षेचे विषय राजकारणाशी जोडणे अतिशय चुकीचे आहे, कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणे हे त्याही पेक्षा चुकीचे आहे. संजय राऊत असो की कोणीही असो, असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता आहे का, त्यांना काही सुरक्षा देण्याची गरज आहे का? ही सर्व कार्यवाही इंटेलिजन्स डिपार्टमेंट करत असते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काम करत नाहीत, परंतु, हे पत्र विभागाकडे जाईल आणि त्यांना सुरक्षा दिली जाईल.असे त्यांनी यावेळी माध्यमाना सांगितले.