थोडक्यात
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का
मीरा-भाईंदरमधील भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची अडचण वाढली आहे.
राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. मीरा-भाईंदरमधील भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री नितेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मनोज राणे यांच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची अडचण वाढली आहे.
राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. अशा वेळी झालेलं हे पक्षांतर महत्त्वाचं मानलं जात आहे.
मनोज राणे यांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी, "विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही शिवसेनेत दाखल झालो असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक कामात सक्रिय राहणार आहोत," अशी प्रतिक्रिया दिली. मनोज राणे यांच्या प्रवेशामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद वाढेल, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, महायुतीचे वरिष्ठ नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीच्या नावानेच लढवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करत आहेत. तरीदेखील पक्षांतर सुरूच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचं नेमकं समीकरण अजूनही स्पष्ट झालेलं नसून, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुका अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.