भारतीय रेल्वे आता त्यांच्या शतकांहून जुनी झालेल्या नियंत्रण प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. सद्यःस्थितीत वापरली जाणारी नियंत्रण प्रणाली आता कालबाह्य झाली असून, वाढत्या रेल्वे वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर तिच्या आधुनिकीकरणाची गरज अधिक जाणवते आहे. एका अभ्यासपूर्ण अहवालानुसार, रेल्वे बोर्ड नवीन आधुनिक प्रणाली राबवण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये ऑपरेशन्स आणि ट्रॅफिक कंट्रोलसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे ट्रेनचा वेग वाढणार असून, अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
नवीन प्रणालीत एक इंटिग्रेटेड कमांड सेंटर असेल, जेथे ट्रेन ऑपरेशन्सशी संबंधित सर्व विभाग एकत्रितपणे काम करतील. हे सेंटर मार्ग नियोजन, प्रवास व्यवस्थापन आणि आपत्कालीन उपाययोजना अधिक कार्यक्षमतेने पार पाडेल. सध्या बहुतांश कामे मॅन्युअल पद्धतीने केली जात असल्याने ट्रेन कंट्रोलर्सवर खूप ताण असतो. नव्या तंत्रामुळे त्यांचे काम अधिक सुलभ होईल. रेल्वे बोर्ड जपान, रशिया, फ्रान्स, स्पेन आदी देशांच्या आधुनिक प्रणालींचा अभ्यास करत आहे. मात्र भारतातील भौगोलिक आणि ऑपरेशनल गरजा लक्षात घेता, ही तंत्रे भारतात थेट लागू करता येणार नाहीत. अलीकडील अपघातांमुळे ही सुधारणा अनिवार्य ठरली आहे. यासाठी रेल्वेने एका समितीची स्थापना केली असून ती लवकरच सुधारणा प्रस्ताव सादर करणार आहे.
हेही वाचा...