आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे. ‘मराठी विजय दिना’च्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर येत असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण तपशील मांडले.
राऊत म्हणाले की, “आजचा कार्यक्रम सकाळी साडेअकरा वाजता सुरू होईल. सुरुवात मराठी राज्यगीताने होणार असून, कोळीवाड्यातील काही स्थानिक बंधूंच्या बँड पथकाकडून सादरीकरण केले जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहेत.”
विशेष म्हणजे, “इतर कोणत्याही पक्षाचे मान्यवर उपस्थित राहिले, तरी त्यांना मंचावर स्थान दिले जाईल,” असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन अत्यंत आखीव रेखीव पद्धतीने करण्यात आले आहे. सभागृहाबाहेर हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांसाठी मोठ्या एलईडी स्क्रीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. "हाजी अली रोडपर्यंत स्क्रीन्स बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक हा कार्यक्रम पाहू शकतील," असं राऊतांनी सांगितलं.
कार्यक्रमाच्या शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राला उद्देशून एकत्रित भाषण करणार आहेत. “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आशेचा आणि आनंदाचा क्षण आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून याबद्दल उत्साहाचे वातावरण आहे,” असे राऊत म्हणाले.
राज्यसरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, “मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही लढा दिला. त्यासाठी आमच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले, पण आम्ही कधीही न डगमगता संघर्ष केला.”
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. “गुजरात आणि महाराष्ट्र एकेकाळी एकच होते. बडोदा हे मराठ्यांचं संस्थान होतं. अशा वेळी 'जय गुजराती' घोषणा देऊन तुम्ही मराठी जनतेचा अपमान करत आहात,” अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे यांना सुनावलं.
हेही वाचा