आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात दिल्ली सल्तनत आणि मुघल काळाबाबत नव्या स्वरूपात माहिती सादर करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मतभेद उफाळले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (NCERT) इतिहासाच्या अध्यायात धर्मसहिष्णुतेचा अभाव, अत्याचार व हुकूमशाही कारभारावर भर देणारे बदल केले आहेत. या बदलांवर प्रतिक्रिया देताना भाजपने या पावलाचे स्वागत करत ते “इतिहासाचे वस्तुनिष्ठ चित्रण” असल्याचे म्हटले आहे. भाजपचे नेते प्रविण खंडेलवाल म्हणाले, “मुघलांनी देशावर केवळ राज्यच केले नाही, तर लोकांवर अनेक प्रकारचे अत्याचारही केले. हे वास्तव आजवर लपवले गेले होते, त्यामुळे पुढच्या पिढीला सत्य माहीत होणे आवश्यक आहे.”
भाजपचेच अरविंद शर्मा यांनी सांगितले की, “एनसीईआरटी पुस्तकांमध्ये कोणताही बदल आधी समितीकडून तपासला जातो आणि त्यानंतरच तो अधिकृतपणे लागू केला जातो.” मात्र काँग्रेसने या बदलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते तनुज पुनिया यांनी सांगितले की, “शैक्षणिक पुस्तकांमधील मजकूर राजकीय हेतूंनी प्रभावित न होता सुस्पष्ट आणि वस्तुनिष्ठ असावा. विद्यार्थ्यांनी इतिहास समजून घेत आपले विचार स्वतः तयार करावेत, यासाठी संतुलित मांडणी आवश्यक आहे.”
नव्या अध्यायांमध्ये बाबरला “निर्दय विजेता” म्हणून मांडले असून, अकबरच्या कारभारात “क्रौर्य आणि सहिष्णुतेचे मिश्रण” असल्याचे नमूद केले आहे. औरंगजेबच्या काळातील मंदिर व गुरुद्वारांच्या नाशाचाही उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. या नव्या बदलांचा आजच्या समाजावर परिणाम होऊ नये यासाठी ‘इतिहासातील अंधकारमय कालखंड’ नावाच्या एका विभागात स्पष्ट करण्यात आले आहे की, “भूतकाळातील घटनांसाठी सध्याच्या काळात कोणालाही दोषी धरू नये.” “Exploring Society: India and Beyond” हे अद्ययावत पुस्तक यावर्षीपासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दिल्ली सल्तनत व मुघल कालखंडाबाबतची माहिती यापूर्वी सातवीत होती, ती आता आठवीत समाविष्ट करण्यात आली आहे.
हेही वाचा...