Pappu Yadav Challenges Raj Thackeray Over Marathi Language Row : काल दादरच्या वरळीमध्ये ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी झालेल्या या मेळाव्याने 18 वर्षांपासून दुरावलेल्या दोन्ही भावांना एकत्र केले. हा विजयी मेळाव्याचा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठी कार्यकर्ते वरळी डोममध्ये दाखल झाले होते. मात्र काल झालेल्या मेळाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ पाहायला मिळत आहे. मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये बोललीच गेली पाहिजे या राज ठाकरे यांच्या भूमिकेला आता पुर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी चॅलेंज दिले आहे. त्यांनी अत्यंत कठोर शब्दात राज ठाकरेंना चेतावणी दिली असून राज ठाकरेने ही गुंडगिरी थांबवली नाही तर मुंबईमध्ये येऊन सर्व अहंकार बाहेर काढेन अशी धमकी त्यांनी राज ठाकरेंना दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवरून जे काही राजकारण तापलंय त्यात आता बिहारच्या पप्पू यादवने ही उडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या बाहेरील भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मारहाण केली. याच पार्शवभूमीवर पप्पू यादव याने आपले मत मांडले. "महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय चालू आहे. त्यांना मराठी बोलण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे.परप्रांतीयांवर हा अन्याय चालू आहे.ही मोठी गुंडगिरी आहे. मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात उत्तरप्रदेश मधल्या लोकांनी मोठे योगदान दिले आहे. मुंबई ही सर्वांची आहे कोणा एकट्याची नाही. भाजपच्या इशाऱ्यावर राज ठाकरे गुंडगिरी करत आहे . ही गुंडगिरी लगेचच थांबली पाहिजे नाहीतर मुंबई मध्ये येऊन राज ठाकरे तुझी सगळी हेकडी बाहेर काढेन" अश्या शब्दात पप्पू यादव याने राज ठाकरे यांना धमकावले आहे.
दरम्यान त्यांनी याआधीच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव चुकून घेतले गेले असून त्यांचा मी नेहमी सन्मान करतो अशी भूमिका यावेळी पप्पू यादव याने मांडली. पप्पू यादवच्या या अश्या आव्हानामुळे राज ठाकरे आता त्याला कसे प्रतिउत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा