अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट होत आहे. त्यातून देशभरातून काँग्रेसमधील लोकनेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे निश्चितच काही मोठे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता एवढंच म्हणेन आगे आगे देखीये होता है क्या…”
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेली उलथापालथी आणि फोडाफोडीच्या मालिकेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस मात्र एकसंध होता. मात्र आज दुपारी काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. आता आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या पुढील राजकीय वाटचालीबात काय निर्णय घेणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. 'आगे आगे देखिए होता है क्या' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.