Rahul Gandhi | Sanjay Raut
Rahul Gandhi | Sanjay RautTeam Lokshahi

राहुल गांधींची ‘भारत जोडो’, जम्मू-कश्मीरच्या भूमीवर नवा अध्याय; राऊतांनी केले कौतुक

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून राहुल गांधींचे कौतुक केले आहे
Published on

मुंबई : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त पठाणकोट ते जम्मू असा प्रवास गांधींबरोबर करता आला. 4 हजार किलोमीटर हा तरुण नेता चालत आहे. त्यांच्या पाठीमागे हजारो लोक चालत आहेत, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून राहुल गांधींचे कौतुक केले आहे. बर्फाचे डोंगर पार करून गांधी कश्मीरात पोहोचतील व तिरंगा फडकवतील तेव्हा देशाच्या राजकारणातले नवे पर्व सुरू झाले असेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Rahul Gandhi | Sanjay Raut
पवारांवर केलेल्या टीकेनंतर आंबेडकरांना आठवलेंचा सल्ला; म्हणाले, पवारांनी सहकार्य...

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त पठाणकोट ते जम्मू असा प्रवास गांधींबरोबर करता आला. 4 हजार किलोमीटर हा तरुण नेता चालत आहे. पठाणकोटचे दृश्य मी पाहिले. हजारो तरुण हातात पेटत्या मशाली घेऊन जम्मूत प्रवेश करीत होते व त्या पेटत्या मशालींनी त्या वेळी सारे आसमंत उजळून निघाले होते. जम्मू-कश्मीर हा यात्रेचा शेवटचा टप्पा आहे. जम्मूत पारा कमालीचा खाली घसरला. त्यात पाऊस. त्या परिस्थितीत राहुल व त्यांच्या पाठीमागे हजारो लोक चालत राहिले. मग जम्मूचा प्रवास संपवून प्रत्यक्ष खोऱ्याची, म्हणजे कश्मीरची सफर सुरू झाली. नगरोटापासून पुढे उधमपूर व नंतर पहाडी चढाई सुरू होईल. हा सर्व खडतर प्रवास राहुल गांधी करतील. रस्ता आहे, पण त्यावर बर्फाचे डोंगर झाले. ते पार करून गांधी कश्मीरात पोहोचतील व तिरंगा फडकवतील तेव्हा देशाच्या राजकारणातले नवे पर्व सुरू झाले असेल.

370 कलम हटवल्यावर जम्मू-कश्मीरमध्ये काय बदलले? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे व बंदुकांच्या जोरावर तात्पुरती शांतता नांदते आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या यात्रेदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा मांडला व जम्मूच्या लोकांनी त्यास प्रतिसाद दिला. गांधी म्हणाले, ‘बाहेरचे लोक येऊन जम्मूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.’

ज्या कश्मिरी पंडितांच्या हत्येचा व घरवापसीचा ‘प्रपोगंडा’ भाजपने राजकारणासाठी केला, ते कश्मिरी पंडित आज नेमक्या कोणत्या स्थितीत जगत आहेत? सत्य असे आहे की, पंडित आजही भीतीच्याच छायेखाली जगत आहेत. 370 हटवल्यानंतरही कश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. आजही कश्मीर एक बंदिवान नंदनवन आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत व बेरोजगारीमुळे त्यांच्यात वैफल्य आहे. 370 कलम हटवल्यावर बाहेरचे उद्योग तेथे येतील हा भ्रम खोटा ठरला, असा निशाणा राऊतांनी भाजपवर साधला.

देश जोडण्यासाठी मातीवर चालावे लागते. राहुल गांधी चालत आहेत. 1947 चा भारत-पाक झगडा जमिनीवरून झाला व शेवटी देश तुटण्यापर्यंत गेला. हे विभाजन आणि फाळणीच्या जखमाही कशा ते जम्मूत पाहिले. माणूसच भांडत बसलाय. राहुल गांधींना ते भांडण मिटवायचेय, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com