चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झाले - देवेंद्र फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना नंतर पहिल्यांदाच असा जाहीर कार्यक्रम असल्यानं बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येनं येत आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर फडणवीस बोल होते. ते म्हणाले की, "इंदू मिलमधील स्मारकारचं काम वेगाने सुरु आहे. आज राज्य सरकारच्या वतीने मी आश्वासन देतो की त्याचा देखील कार्यक्रम लवकरच होईल."
तसेच "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानवंदना अर्पित करतो. आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा आहे. या देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. व्यक्तीला सामान अधिकार असेल, कोणामध्येही भेद करता येणार नाही असं संविधान त्यांनी दिलं. आज आपला देश प्रगती करत आहे कारण लोकशाही जिवंत आहे. 'एक मार्ग एक संधी' संविधानाने उपलब्ध करुन दिली. त्यांचे आभार मानण्याकरता आपण सगळे जमले आहोत. त्यांचा संदेश जगाच्या कल्याणाचा आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालेलं आहे." असे म्हणत फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे.