बेळगाव कोर्टाच्या समन्सनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला...
नुकताच गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुन्हा अडचणीत सापडले आहे. 30 मार्च 2018 रोजी बेळगावात संजय राऊत यांनी भाषण केलं होते. त्याच प्रक्षोभक भाषणाप्रकरणी बेळगाव कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना 1 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राऊत कोर्टात हजर न राहिल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
काय म्हणाले संजय राऊत?
कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबलं तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील. त्यात प्रक्षोभक काय ते कळलं नाही, असे ते म्हणाले. २०१८च्या भाषणाची दखल घेऊन त्यांनी कोर्टात हजर राहायला सांगितलं आहे. याचा अर्थ मी कोर्टात जावं. मग कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा. ही माझी माहिती आहे. किंवा मला अटक करावी आणि मला बेळगावच्या तुरुंगात टाकावं अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचं माझ्या कानावर आहे”, अशी खळबळजनक माहिती संजय राऊतांनी यावेळी दिली.
पुढे ते म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेलं वक्तव्य चार दिवसांपूर्वीच आहे. सोलापूर सांगलीचा भाग कर्नाटकात घेण्यासंदर्भात. त्यांनी विषयाला तोंड फोडलं. आमच्यासारख्या लढणाऱ्या लोकांना बेळगावात बोलावून हल्ला करण्याचं कारस्थान आहे. हे कारस्थान शिजताना दिसतं. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी. असे ते यावेळी म्हणाले.
शिवसेना आहेच. शिवसेनेने सीमा प्रश्नासाठी ६९ हुतात्मे दिलेत. मी ७०वा हुतात्मा व्हायला तयार आहे. बाळासाहेबांनी सीमा प्रश्नासाठी तीन महिन्याचा तुरुंगवास भोगला आहे. शिवसैनिकांनी तीन दिवस मुंबई पेटवली होती. मला अटकेची भीती नाही. महाराष्ट्रासाठी मला अटक करणार असतील तर मी नक्कीच जाईल. मी लपून छपून जाणार नाही. कोल्हापूरच्या रस्त्याने हजारो शिवसैनिक जाऊ आणि बेळगावच्या न्यायालयात स्वत:ला अटक करून घेऊ, असे देखील स्पष्ट मत संजय राऊतांना यावेळी केले.