मविआमधील अनेक लोक आमच्या संपर्कात; शंभूराज देसाईंचा मोठा दावा, लवकरच मोठे स्फोट
मुंबई : शिंदे गटातील नेते संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला होता. यावरुन आता विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. अशात, शंभूराज देसाई यांनी विनायक राऊतांवर हल्लाबोल केला आहे. विनायक राऊतांना डिफरमेशनची नोटीस देणार असल्याचे देसाईंनी सांगितले आहे. तर, महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत लवकरच मोठे स्फोट होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी विनायक राऊत हे बोलले होते की मी त्यांच्या संपर्कात आहे, उद्धव साहेबांना कॉल केला आहे असं म्हटले होते. हे धादांत खोटं आहे. तसेच, त्यांचा दावा सिध्द करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी राऊतांना दिला होता. दोन दिवस पूर्ण झाले आहेत. मी आज डिफरमेशनची नोटीस त्यांना देणार आहोत. आज पाचच्या अगोदर त्यांना मी नोटीस देतोय, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
ठाकरे गटाची परिस्थिती ही हतबल झाल्यासारखी आहे. त्यांना कितीही आरोप करायचे ते करुद्या. आम्ही काम करत राहू व ते आरोप करतील आणि आम्ही ऐकून घेऊ, असं नाही त्यांना आज नोटीस देणार आहे. त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं नाही तर आम्ही कायदेशीर बाबी पडताळू पाहू.
ठाकरे गट दिशाहीन झालेला आहे. कोणताही कार्यक्रम नाही, कोणताही व्हिजन नाही. अडीच वर्ष त्यांनी काही केलं नाही आणि आम्ही करतोय ते त्यांना बघवत नाही. आम्ही मोठं-मोठी काम करतोय ती त्यांना बघवत नाहीत. स्वतः सरकारमध्ये असताना काहीच कार्यक्रम केलेला नाही. परंतु, सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तर, शिंदे गटातील अनेक नेते भाज तिकीटावर लढण्या इच्छुक असल्याचे जयंत पाटील यांनी म्हंटले होते. यावरही शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटील यांच्यावर संजय राऊत यांच्या बाजूला बसण्याचा परिणाम झाला असं वाटतंय, असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, संजय राऊत यांना चुकीची चिठ्ठी काढायची सवय झाली आहे 100 खोट्या चिठ्या काढल्या जातायत, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, गजानन किर्तीकर व आमच्यात चांगला समन्वय आहे. गजानान किर्तीकरांनी एखाद्या कामाबद्दल केलेलं वक्तव्य आहे. मुख्यमंत्री त्यांची समजूत काढतील. समन्वय समितीही काही महत्वाचे मुद्दे काढते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांसमोर ठेवते अंतिम निर्णय ते घेतात, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.