भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंना भोंग्याचा त्रास होतोय; संजय राऊतांचा हल्लाबोल
पुणे : भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंना (Raj Thackeray) भोंग्याचा त्रास होतोय असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या भोंग्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली. काहीजण राज्य पेटवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र दारुगोळा सगळा शिवसेनेकडे (Shiv Sena) आहे त्यामुळे कुठेच आग लागली नाही असा टोला राज ठाकरेंना लगावला आहे. तसंच ब्राम्हण मुख्यमंत्री पाहिजे असं म्हणणाऱ्या रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा देखील त्यांनी समाचार घेतला आहे.
बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे...
संजय राऊत म्हणाले, ज्यांनी जिवंतपणे बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ते आम्हाला बाळासाहेब सांगत आहेत. भोंग्यांचा मुद्दा सर्वात आधी बाळासाहेब ठाकरेंनी उचलला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर सर्व मौलवींना बोलावून मशिदीवरील भोंगे बंद करण्यास सांगितलं. शिवसेनेला संपवण्यासाठी दिल्लीतून भाजपकडून मोठे कारस्थान केले जातात असं संजय राऊत म्हणाले.
सोमय्या पाचव्या दिवशी तुरुंगात जाणार...
मला पुणेकरांचा अभिमान आहे, कारण त्यांंनी पुणे महानगरपालिकेत औरंग्याला पायरी दाखवली असं म्हणत किरीट सोमय्या यांच्यावर घणाघात केला. हे महाशय दुसऱ्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात, यांचा स्वत:चा विक्रांत घोटाळा बाहेर आला. ज्या युद्धनौका निवृत्त झाली, त्यावेळी युद्धनौका भंगारात न देता वाचवून त्यावर संग्रहालय तयार केलं. त्यानंतर आम्ही राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यानंतर यांनी पैसे गोळा करतो अशी घोषणा केली आणि 600 डबे गोळा करुन मुंबईतून पैसे जमा केले मात्र ते पैसे राजभवनात पोहोचलेच नाहीत असं सोमय्या म्हणाले. तसंच या प्रकरणात आता सोमय्यांवर दोन दिवसात गुन्हा दाखल होणार असून, पाचव्या दिवशी ते तुरुंगात जातील असं राऊत म्हणाले.