बेळगावमध्ये बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा कट - संजय राऊत
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी जत तालुक्यातील उमराडी गावात कन्नड वेदिका संघटनेच्या काही लोकांनी झेंडे फडकवल्याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत हे तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर जामिनावर बाहेर आले आहेत. राऊत म्हणाले की. “बेळगाव कोर्टाचे मला समन्स हा नक्कीच कट आहे. मला तिथे बोलवून माझ्यावर हल्ला करून मला अटक करायची आहे त्यांना. त्यांची पूर्ण तयारी आहे. मला माहिती आहे. पण मी घाबरणार नाही. मी नक्कीच जाईन”
तसेच अचानक कर्नाटकच्या बाजूने राजकारण का तापलं आहे? यामागे राजकारणही आहे आणि निवडणुकाही आहेत. माझं अमित शाह यांना आवाहन आहे की तुम्ही त्याकडे लक्ष द्या. नाहीतर आम्हाला भीती वाटतेय की इथे रक्तपात होऊ शकतो. ही आता केंद्राची जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टीत राजकारण नका करू” असे संजय राऊत म्हणाले.