भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचताना दिसत आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सीमारेषेवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून, भारतीय लष्कराने हा प्रयत्न पूर्णपणे निष्फळ ठरवला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर थेट हल्ले केले. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून अत्यंत अचूक हवाई कारवाई करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान पाकिस्तानी लष्कर भारताला प्रभावी प्रत्युत्तर देऊ शकले नाही. भारताच्या हल्ल्यांनी पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था उघडी पडली.
या कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी ड्रोन हवेतच नष्ट केले. भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे ड्रोन भारताच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच उडवून लावण्यात आले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानकडे असलेल्या चिनी ड्रोन आणि संरक्षण प्रणालीही निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले.
भारताच्या कारवाईचा मोठा धसका घेत पाकिस्तानने आता एलओसी आणि पीओके भागात अँटी-ड्रोन सिस्टम्सची संख्या वाढवली आहे. कोटली, रावलकोट आणि भीमबर सेक्टरमध्ये काऊंटर अनमॅन्ड एरियल सिस्टम्स तैनात करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सुमारे ३० अँटी-ड्रोन सिस्टम्स बसवल्या असून, त्याद्वारे १० किलोमीटरपर्यंत ड्रोन हालचाली टिपता येतील, असा दावा केला जात आहे.
मात्र, हे दावे प्रत्यक्ष युद्धस्थितीत किती प्रभावी ठरतात, हे भविष्यातच स्पष्ट होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने केवळ दहशतवादी अड्ड्यांनाच लक्ष्य करत सामान्य नागरिकांना इजा होणार नाही, याची काळजी घेतली. या कारवाईमुळे भारताने पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील आपली कठोर आणि जबाबदार भूमिका जगासमोर ठामपणे मांडली आहे.