संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी दादर मेट्रो स्थानकाचं चैत्यभूमी असं नामकरण करण्याची मागणी जोर धरत असते. कालही भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी या नामांतरासाठी शांततेत निदर्शने केली, आणि आज पुन्हा या मागणीने जोर धरला आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी दादरच्या मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नरेंद्र जाधव यांनी आज सकाळीच चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत दादरच्या मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी असं नाव देण्याची मागणी पुन्हा वेळोवेळी केली. आज चैत्यभूमीवर अफाट जनसागर उमटला असून, जवळपास १५ ते २० लाख लोक येणार असल्याचा अंदाज आहे. ठिकठिकाणी पुस्तकांचं प्रदर्शन भरल असल्याने चार कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिस्तबद्ध आणि श्रद्धेने अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत, असं जाधव यांनी नमूद केलं.
पालिकेकडूनही चैत्यभूमीवरील सुविधांसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं असून, बाबासाहेबांवरील एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल स्मारकाचं काम मार्गी लावण्यासाठी तात्काळ समन्वय समिती नेमावी अशी मागणी देखील जाधव यांनी केली. तसेच दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नाव देण्यात यावं, अशी जोरदार मागणी त्यांनी आंबेडकरी जनतेच्या वतीने व्यक्त केली.
दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाधव यांच्या मागणीचं स्वागत केलं आणि आपणही अनेक वर्षांपासून दादर स्थानकाच्या नामांतराची मागणी करत आहोत, असे म्हटले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जाधव यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बाबासाहेबांमुळेच आपले अस्तित्व आहे, असेही त्यांनी सांगितले.